(एस.एन. बोस या पानावरून पुनर्निर्देशित)
सत्येंद्रनाथ बोस
सत्येंद्रनाथ बोस (बंगाली: সত্যেন্দ্রনাথ বসু} (1894-1974) भारतीय शास्त्रज्ञ
बोस-आइन्स्टाईन जोडीतील विश्वविख्यात शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ यांचा जन्म जानेवारी १ १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील सुरेंद्रनाथ हे रेल्वेत नोकरीला होते.
सत्येंद्रनाथ यांचे शालेय ते पदवी पर्यंतचे शिक्षण कोलकाता येथेच झाले. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळ्वून उत्तीर्ण होण्याचा जणू त्यांना छंदच होता. पहिला क्रमांक त्यांनी कधीच सोडला नाही. शाळेत असतांना एकदा त्यांना गणिताच्या परिक्षेत १०० पैकी ११० गुण देण्यात आले कारण सगळी गणिते त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. त्यांचे मित्रच नव्हे तर इतरही विद्यार्थी म्हणत की सत्येंद्रनाथ शिकत असतांना पहिला क्रमांक सोडून देऊन इतर क्रमांकासाठीच प्रयत्न करता येतील. सत्येंद्रनाथ यांनी प्रेसीडेन्सी कॉलेज मधून १९१५ साली आपली पदवी प्राप्त करतांनाही पहिला क्रमांक सोडला नाहीच, यावेळी ते संपूर्ण विद्यापिठातून प्रथम आले होते. त्यांना जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांचे सतत मार्गदर्शन आणि उत्तेजन मिळाले. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि व्हायोलीन सारखे एसराज नावाचे वाद्य ते अतिशय उत्तमपणे वाजवु शकत.
१९१५ सालीच सत्येंद्रनाथांनी अल्बर्ट आइनस्टाइन यांचा मूळ जर्मन भाषेतील असलेला सापेक्षता सिद्धांत सर्वप्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरित केला. १९१६ ते १९२१ या काळात सत्येंद्रनाथांनी कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक पदावर काम कले. १९२१ साली ते ढाका येथील विद्यापिठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
१९२३ साली सत्येंद्रनाथांनी प्रसिद्ध गणिती मॉल्ट यांच्या समीकरणांशी संबंधित स्वतःचे शोध इंग्लंड येथून प्रकाशित होणारे मासिक फिलॉसॉफीकलकडे पाठविले पण ते शोध छापण्यास त्या मासिकाने नकार कळविला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ निराश झाले नाहीत, त्यांनी त्यांचा प्रबंध आइन्स्टाईन यांच्याकडे जर्मनीला पाठविला. आइन्स्टाईन यांनी तो लेख जर्मन भाषेत भाषांतरित करून तेथे तो छापून येण्यास मोलाची मदत केली. लेख जगभरातील गणितींच्या पसंतीस उतरला, त्यामुळे बोस प्रसिद्धिस आले. आपल्या कामाच्या व्यापातून सत्येंद्रनाथ यांनी सुट्टी काढून ते मादाम मेरी क्युरी यांच्यासह पॅरीस येथे १० महिने काम केले. हे काम आटोपून सत्येंद्रनाथ जर्मनीला गेले. तेथे त्यांचे भव्य स्वागत झाले. आइन्स्टाईन यांच्यामुळे इतर वैज्ञानिक जसे मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग, सोमरपॅण्ड यांच्याशी अनेक विषयांवर विस्तृत चर्चा करता आल्या.
१९४५ साली सत्येंद्रनाथांनी आपली ढाका येथील नोकरी सोडून ते कोलकाता येथे १९५६ पर्यंत प्रोफेसर म्हणून काम केले. या कामातून सेवानिवृत्त झाल्यावर विश्व भारती विद्याल्याचे उपकुलपति म्हणून त्यांची नेमणूक झाली.
भौतिकशास्त्र विषयाचे त्यांनी २४ लेख लिहिले. या विषयातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
१९५८ साली सत्येंद्रनाथांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले आणि त्यांना राष्ट्रीय प्रोफेसर म्हणण्यात येऊ लागले, त्याच वर्षी लंडन येथील रॉयल सोसयटीने त्यांना आपला फेलो म्हणून जाहीर केले.
दि. फेब्रुवारी ४ १९७४ रोजी सत्येंद्रनाथांचे हृदय रोगामुळे निधन झाले.