Pages

हार्दिक स्वागत

http://picasion.com/gl/8bzq/
#### मंगेश वानखडे स. शिक्षक, शाळा हातगाव , पं. स. ,दारव्हा जि. यवतमाळ मो.नं. ९७६४२७३२०९ तर्फे हार्दिक स्वागत ! 🙏🙏💐🙏🙏@@@@ सोबतच माझ्या MANGESH KID-TECH By Mangesh Wankhade या You Tube Channel ला भेट देऊन शाळेचे विविध उपक्रम पहा व Channel subscribe करा ####

Online Updates

*** blog ला भेट देणाऱ्या सर्वांचे हार्दिक आभार!! 🙏🙏 *** ----------------���� Thank you 🙏🙏 ..... Visit again for more information.. 🙏🙏 ���� -------- ..... ....---

संत तुकाराम



संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड विधान तुकोबाराय अभिमानाने करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं।।’ असे म्हणत, शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले, जातिभेदावर टीका केली, श्रीविठ्ठलावरची भक्ती प्रकट केली, अध्यात्माचे सार सांगितले. देश-काळ-लिंग भेदाच्या पलीकडे त्यांची काव्य प्रतिभा झेपावलेली आपल्याला दिसते. ‘विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म। भेदाभेद-भ्रम अमंगळ।।’ या भूमिकेचा त्यांनी १७ व्या शतकात प्रसार केला. सांप्रदायिक आभिनिवेश बाजूला ठेवून ऐक्यभाव, समता प्रस्थापित केली.
भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते. त्यांचे अभंग म्हणजे ‘अक्षर वाङ्‌मय’ आहे. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.
अनुक्रमणिका
* १ जीवन
* २ वंशावळी
* ३ जीवनोत्तर प्रभाव
* ४ माध्यमांतील चित्रण 
   * ४.१ चित्रपट
* ५ चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र
* ६ पुस्तके
* ७ तुका झालासे कळस
* ८ बाह्य दुवे
जीवन
तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.
त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवडी) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्र्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..
तुकारांमांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली. सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांच्या अभंग लिहिण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामाने संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. तुकाराम महाराज, हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते.
फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे निधन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
वंशावळी
* विश्वंभर आणि आमाई अंबिले
यांना दोन मुले हरि व मुकुंद
* यातील एकाचा मुलगा विठ्ठल
* दुसऱ्याची मुले -
* पदाजी अंबिले
* शंकर अंबिले
* कान्हया अंबिले
* बोल्होबा आणि कनकाई अंबिले
यांना दोन मुले
* सावजी (थोरला) तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले.
* तुकाराम (धाकटा)
जीवनोत्तर प्रभाव
संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते. यावरून तुकाराम महाराज पाळीत असलेल्या धर्माचे स्वरूप किती उदार होते याची कल्पना यावी.
माध्यमांतील चित्रण
चित्रपट
इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत 'संत तुकाराम' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट काढण्यात आले. हा चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्याकाळचा उच्चांक होता.
हा चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर ॲन्ड कंपनी'ने. 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एक नाटकाचे चित्रण होते आणि शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही.
* 'तुका झालासे कळस' (१९६४)-दिग्दर्शक राजा नेने. या चित्रओअटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती.
* १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचं नाव होतं 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्स्‌ने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या.
* त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेवी यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती.
* यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्स्‌चा 'श्री जगत्गुरू तुकाराम'.
* इ.स. २०१३सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे.


चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हॉलंड मध्ये वास्तव असलेल्या चित्रकार शिल्पकार व कवी भास्कर हांडे यांनी तुकारामाच्या गाथेतील अभंगावरून स्फुरलेल्या चित्रांची शिल्पांची व मुद्रा चित्रांची मालिका तयार केली आहे. तिला 'तुझे रूप माझे देणे' असे नाव दिले आहे. त्या चित्रांची कायमस्वरूपी मांडणी वैश्विक कला पर्यावरण औंध(पुणे) येथे केली आहे. लोकांसाठी हे कलादालन उघडे आहे. गाथेतील अभंगांवर चित्र काढण्याचा हा प्रयोग प्रथमच आहे.
पुस्तके
* तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.
* 'तुका झालासे कळस' : लेखक अर्जुन जयराम परब
* 'तुका झालासे कळस' : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
* 'तुका झालासे कळस' : लेखक डॉ. रामचंद्र देखणे
* 'तुका झालासे कळस' : लेखक स.कृ. जोशी
* ’विद्रोही तुकाराम’ : लेखक आ.ह. साळुंखे
* पुन्हा तुकाराम : दिलीप चित्रे
* 'Says Tuka (चार खंड): लेखक दिलीप चित्रे
* ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.
* ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-१८६९) भाषांतरकार : विष्णु परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ
तुका झालासे कळस
ही ओळ तुकाराम शिष्या बहिणाबाईच्या अभंगातली आहे. मूळ अभंग असा : -
संतकृपा झाली l इमारत फळां आली l
ज्ञानदेवें रचिला पाया l उभारिलें देवालयां l
नामा त्याचा किंकर l तेणें रचिलें तें आवार l
जनार्दन एकनाथ खांब दिल्हा l
भागवत तुका झालासे कळस l
भजन करा सावकाश ll